
अतिक्रमण करणारी दुकाने आठवडी बाजारात शिफ्ट
नगरपंचायत प्रशासनाचे होत आहे कौतुक
सेलू :–
शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्या दुकानांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर उपाय झाला आहे. नगरपंचायत प्रशासनाने मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी) सकाळी ११.३० वाजता केलेल्या कारवाईत सर्व अतिक्रमणकारी दुकाने हटवून त्यांना आठवडी बाजारातील मोकळ्या जागेत हलविण्यात आले. या निर्णायक पावलाचे नागरिक व व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे.
सेलू शहरात आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असतानाही काही बाहेरील व्यापाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरच दुकाने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. परिणामी रस्त्यांवर प्रचंड कोंडी होत होती आणि अपघाताची शक्यता वाढली होती. या वाढत्या समस्येकडे नागरिकांनी वारंवार लक्ष वेधूनही ती कायम होती. अखेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेत कठोर निर्णय घेतला. त्यांनी रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांना मज्जाव करत त्यांच्या व्यवसायासाठी आठवडी बाजारातील खालील जागा निश्चित केली.
या कारवाईमुळे मुख्य रस्ता पुन्हा मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या निकाली निघाल्याने शहरवासीयांनी मुख्याधिकारी अग्रवाल यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.





