जागतिक योग दिवस २०२५ जिल्हास्तरीय समारंभ उत्साहात संपन्न
वर्धा :-
भारतातील योगाचे महत्व संपुर्ण जगाने स्विकारले असून दिवसेंदिवस योगाचे महत्व वाढत चालले आहे. निरोगी आरोग्य ठेवून सुख समाधानाने आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस अधिक्षक कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, पतंजली योग परिवार, निसर्ग सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे रंग मंदिर प्रांगण, वर्धा येथे आयोजित “जागतिक योग दिवस २०२५” जिल्हास्तरीय योग समारंभात ते बोलत होते.
मंचावर जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधिक्षक अनुराग जैन, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख, वर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कठाणे, सचिव अशोक गोयंका, प्रदीप बजाज, प्राचार्या अनघा आगवण, पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे उपस्थित होते.
योग ही आपल्या देशाची प्राचीन संस्कृती असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, योग ही दुर्लभ आजारावरील अतिशय उत्कृष्ठ अशी उपचार पध्दती संपूर्ण जगाने मान्य केली आहे. योगाचे महत्व भारत देशासह संपूर्ण जगात वाढत चालले आहे. २१ जून हा अंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत करण्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे. संपुर्ण देशात आज वेगवेगळी योग शिबिरे होत आहेत. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात हे योग दिन साजरा करण्यात येत आहे. योगामुळे आपल्या आरोग्याला फायदा असून नागरीकांनी नियमित योगासने करून आपले आरोग्य सुदृढ बनवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या की, आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे. योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे. योग केल्यामुळे आपल्या शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यालाही फायदा होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने दररोज योगाभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, यंदा योगाचे ११ वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. योगाचे महत्व जागतिक पातळीवर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नागरीकांचे आरोग्य उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारने योगाला प्राथमिकता दिली असून प्रत्येक नागरीकाने योग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात पतंजली योग समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर यांनी विविध आसनांविषयी प्रात्याक्षिकांद्वारे विस्तृत माहिती देऊन योग आसने करून दाखवून उपस्थित मान्यवर व नागरीकांकडून योग करून घेतले. यावेळी योग सहकारी म्हणून योग शिक्षक दिलीप वाकडे, बाबाराव भोयर, राधा घाटोळे व श्रीमती साखरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमात अजय हेडाऊ यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न करण्यात आला. संचालन लता मोकलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या अनघा आगवण यांनी केले. कार्यक्रमात ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उपमुख्याध्यापक विजय जुगनाके, डॉ. देवेंद्र गुजरकर, श्री. अमृतकर, श्रीमती फरकाडे यांच्यासह वर्धा एज्युकेशन सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी शिक्षक, पतंजली योग परिवाराचे योग साधक, निसर्ग सेवा समितीचे योग साधक, विद्यार्थी, पोलिस व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.